जाळगेवाडी माथनेवाडीला अस्मानी संकटाचा फटका
अज्ञात आजाराने १९ करडू व ६ शेळ्या दगावल्या, लाखो रुपयांचे नुकसान
चाफळ/उमेश सुतार : जाळगेवाडी, माथनेवाडी येथे अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. पावसात गारठून झालेल्या अज्ञात आजाराने दोन्ही गावात पंधरा दिवसात १९ बकऱ्या व ६ शेळ्या दगावल्याची घटना घडली. या अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.
चाफळसह परिसरात गेली महिनाभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. वाऱ्यासह पावसाची संततधार सुरू असल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. मात्र अशातच शेतकऱ्यांना आपली जनावरे चरायला सोडावीच लागत आहेत. उभ्या पावसात जनावरे गारठून जात असल्याने त्यांना आजाराला सामोरे जावे लागत आहे. गेले पंधरा दिवसात शेळ्यांना अज्ञात आजाराने पछाडले असून आतापर्यंत 25 शेळ्या, बकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
जाळगेवाडी येथे हनुमान शेळके यांचा शेळ्यांचा कळप आहे. यातील काही शेळ्यांना डोळे, नाक, तोंडातून स्त्राव बाहेर येणे, ताप चढणे व अतिसार प्रकारचा त्रास होऊन त्यातच शेळके यांच्या तीन शेळ्या व तीन बकऱ्या दगावल्याची घटना घडली आहे. यामध्ये शेळके यांचे सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे तर माथनेवाडी या ठिकाणी 15 दिवसात याच आजाराने राजेंद्र गोडसे यांच्या दोन बकऱ्या, विलास गायकवाड यांच्या तीन बकऱ्या, संतोष बोंगाणे यांच्या दोन बकऱ्या व दोन शेळ्या, विलास माकणे यांची एक शेळी व तीन बकऱ्या अशा एकूण तीन शेळ्या व दहा बकऱ्या या आजाराने दगावलेचा प्रकार घडला आहे.
यामध्ये चार शेतकऱ्यांचे मिळून 80 हजारांचे नुकसान झाले आहे. सदर शेळ्यावर संबंधित मालकांनी डॉक्टरांकडून उपचार केले मात्र गारट्यामुळे शेळ्यांचा जीव वाचवण्यात यश मिळाले नाही. संबंधित शेतकऱ्यांना शासनाने तातडीची मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट जागेवाडी आणि माथनेवाडी येथे झाली. यात अज्ञात आजारामुळे शेळ्या दगावल्याची माहिती मिळताच तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद भुतकर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल घाडगे यांनी तात्काळ भेट देत शेळ्यांची तपासणी करून लसीकरण केले व संबंधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन सूचना केल्या.